चंद्रपुरात केंद्र सरकारच्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे स्वागत व जल्लोष

विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले केंद्र सरकारचे अभिनंदन

केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार, कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

ओबीसी विद्यार्थ्यांनी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी साजरा केला जल्लोष
चंद्रपुर : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत हा मोठा निर्णय घेतला आहे. घोषणा होताच काही वेळातच चंद्रपूर शहरात विद्यार्थी व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आज (दि.३० एप्रिल) ला एकच जल्लोष केला व केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत अभिनंदन केले.केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे. आज (दि.३० एप्रिल) ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे. स्वतंत्र भारतात १९५१ साली पहिली जनगणना करण्यात आली होती. तर २०११ साली यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनाच्या माध्यमातून जातिनिहाय जनगणना करण्यात यावी ही आग्रही मागणी होती. अखेर केंद्र सरकारने आता जातीनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात एकच जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करुन जल्लोषात केंद्र सरकारचे स्वागत केले.कॅबिनेट बैठकीतील या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देताना मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, “सामाजिक रचनेचा विचार करून आणि संविधानातील स्पष्ट तरतुदी लक्षात घेऊन मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आज, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारने पुढील जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. हे सरकार आपल्या समाजाच्या व देशाच्या मूल्यांप्रती व हितसंबंधांप्रती कटीबद्ध आहे. हा निर्णय देखील सर्व समाजघटकांच्या कल्याणासाठी घेण्यात आला आहे.या निर्णयाचा ओबीसी सह इतर सर्वच प्रवर्गातील जातींना फायदा होणार आहे. जातनिहाय जनगणना झाल्यास संविधानाने दिलेल्या अधिकार व हक्कांचे खऱ्या अर्थाने प्रत्येक जातीपर्यंत लाभ पोहोचतील, असे डॉ. अशोक जीवतोडे यावेळी म्हणाले.
Post a Comment (0)
Previous Post Next Post