संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन
चंद्रपूर :- भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने सर्व भारतीयांना अधिकार दिलेत. आपण अधिकाराची भाषा करतो. मात्र कर्तव्ये विसरतो. त्यामुळेच संसद व विधिमंडळात आपले प्रतिनिधी प्रामाणिकपणे निवडा आणि आपले अधिकार व कर्तव्य याचे योग्य प्रकारे पालन करा, असे आवाहन सामाजिक समता संघर्ष समितीचे अध्यक्ष इरफान शेख यांनी केले.बाबूपेठ येथील अशोका स्पोर्टिंग क्लब, तथागत सिद्धार्थ बहुउद्देशीय मंडळ आणि कल्याणी बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिन कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
मंचावर सामाजिक कार्यकर्ते कचरुजी बरडे, सुरेश नारनवरे, जितेंद्र डोहणे, कुमार जुनमलवार, शाम कंचल, भीमराव खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
इरफान शेख पुढे म्हणाले, भगवान बुद्ध यांनी समतेचा मंत्र दिला. त्यावर आधारित बौद्ध धम्म आज जगात शांतीचा संदेश देत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली. त्यावर देश योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र आता देशातील वाटचाल चुकीचे दिशेने सुरू आहे. यावर गांभीर्याने विचारमंथन होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रस्तावनेच्या वाचनाने झाली.
कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी शरद शेंडे, रवींद्र भासारकर, राजू लोखंडे आदींसह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

