उलगुलान संघटनेची मागणी
बल्लारपूर :- सततच्या अतिवृष्टीमुळे शहरातील नागरिक विनीत पुणेकर याचे घर पडले. घराची भिंत पडून यात योगिता विनीत पुणेकर 35 या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर घरातील सदस्य गंभीर जखमी झाले. सदर कुटुंब गरीब असून कर्ता पुरुष हा सिकलसेल आजारी आहे आणि याच्यातच त्याच्या पत्नीवर भिंत कोसळून मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेले असून आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे या पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याची मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.राहायला घर नाही व घरातील व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण घरावर आभाळ कोसळलेले असून सदर कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून पाच लाख रुपये द्यावे किंवा रमाई आवास योजनेअंतर्गत तात्काळ घरकुल द्यावे. तसेच सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कित्येक घरांचे नुकसान झाले त्यांना सानुग्रह मदत म्हणून एक लाख रुपये प्रत्येकी कुटुंबाला द्यावे, अशीही मागणी निवेदनात राजू झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. वरील मागणी तात्काळ पूर्ण केली नाही तर या विरोधात उलगुलान संघटना जन आंदोलन करेल, असा इशारा निवेदनाद्वारे शासन व प्रशासनाला देण्यात आला.निवेदन देताना उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू झोडे, संपत कोरडे, वंदना तामगाडगे, स्नेहल साखरे, पंचशील तामगाडगे, सचिन थिपे, नवीन डेव्हिड, सचिन पावडे तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
