बल्लारपूर :- जागतिक दर्जाचे पेपर उत्पादन करणा-या बल्लारपूर पेपर मिलच्या कळमना येथील लाकूड डेपोला आज रविवारी दुपारी 4 वाजता भीषण आग लागली. माहिती मिळताच बल्लारपूर पेपर मिल, बल्लारपूर नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र त्यांना यश मिळाले नाही. आग इतकी भीषण आहे
की, आता ती आटोक्यात आणणे अशक्य आहे. भीषण आगीत करोडोची लाकडे जळून भस्मसात झाली आहेत. जवळच एक पेट्रोल पंप आहे. पंपाचे कर्मचारी पंप सोडून गेले आहेत. या आगीचा भडका पसरत गेल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आता आग गावाकडे येऊ नये, अशी प्रार्थना कळमना ग्रामस्थ करीत असून ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिस आणि प्रशासन त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र सध्या आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य असल्याचे दिसत आहे.
गडचादूर येथील अल्ट्राटेक, अंबुजा, राजुरा नगरपालिका, आष्टी, चंद्रपूर महानगरपालिका, एसीसी यासह जिल्हाभरातील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र आग इतकी भीषण आहे की, ती आटोक्यात आणणे अशक्य आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे आलापल्ली चंद्रपूर महामार्गावरून वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
भीषण आगीची माहिती मिळताच तहसीलदार संजय राईंचवार, ठाणेदार उमेश पाटील, कोठारीचे ठाणेदार तुषार चौहान हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. आगीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची ये-जा थांबवली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत तारा जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या गावात अंधार पसरणार आहे.


