अनाथालय व वृध्दाश्रमात फळवाटप तथा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
चंद्रपूर : दरवर्षी १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून सामाजिक तथा राजकीय नेतेमंडळी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करीत असतात. अशाच प्रकारची सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजिक व राजकीय नेते ॲड. राहुल घोटेकर यांनी समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांसोबत स्वातंत्र्य दिन साजरा करुन विविध उपक्रम राबविले. ॲड. राहुल अरुणजी घोटेकर व मित्रमंडळी यांनी सकाळी ध्वजारोहण करुन शहरातील अनाथाश्रम व वृध्दाश्रम येथे जावून तेथील अनाथ विद्यार्थी, वृध्द व अपंग यांची भेट घेवून आपुलकीने विचारपूस केली. त्यांना फळवाटप केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रदान केले. विद्यार्थ्यांना भारताचा तिरंगा ध्वज भेट दिला. त्यांच्या सोबत वृक्षारोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. दिवसभर चाललेल्या या उपक्रमाने वृद्ध व चिमुकली भारावून गेली. रस्त्याच्या कडेला उघड्यावर राहणारे दुर्लक्षित नागरीक यांनाही फळ वाटप करुन त्यांची विचारपूस केली. त्यांना बोलते केले.एकिकडे देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे तर दुसरीकडे आजही अनेक जण दुर्लक्षित जीवन जगत आहेत, त्यांना अजून खरे स्वातंत्र्य मिळाले नाही, त्यांना जीवन जगण्याच्या प्रवाहात आणणे आपले कर्तव्य आहे, असे विचार मांडून त्यांच्या सोबत घालविलेल्या क्षणांचे समाधान यावेळी ॲड. राहुल घोटेकर यांनी व्यक्त केले.सदर उपक्रमात ॲड.राहुल अरुणजी घोटेकर यांचे सोबत स्वप्नील रमेश कांबळे, सागर तामगाडगे, राजेश वाकोडे, अभिषेक सिंग, हृतिक शेंडे, सचिन इंगोले, विशाल हिवरकर, मंथन नागराळे, अहर्त नगराळे, दिशांत घोटेकर, प्रज्वल बांबोळे, सुमेध चंदनखेडे, आतिफ रझा, स्वराज नाहरकर, मंगेश रंगारी आदी उपस्थित होते.