चंद्रपूर: भद्रावती येथील तरुणीच्या हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला आहे. तरूणींची ओळख पटविल्यानंतर मृतक तरूणींची मैत्रिण विधिसंघर्ष ग्रस्त बालिकेला अटक करण्यात आली. तिने दिलेल्या माहितीनुसार इरई नदीवरील रामसेतू पुलाखालून तरूणीचे शिर ताब्यात घेतले आहे. त्यानंतर हत्याकांडात समाविष्ठ आरोपीला परराज्यातून अटक केली आहे.मृतक युवती नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील रहिवासी आहे.
मृतक व ताब्यात घेण्यात आलेली विधीसंघर्षग्रस्त बालिका या दोघी नागपूर व चंद्रपूर येथे एकत्र राहात होत्या. दरम्यान दोघींमध्ये पैशावरून तथा इतर गोष्टींवरून वारंवार वाद व्हायचा. हा वाद इतका विकोपाला गेला की, विधीसंघर्ष बालिकेने प्रियकराच्या मदतीने प्रथमत: चंद्रपूर येथे बोलाविले. चंद्रपुरातील वरोरा नाका चौकातून रात्री मृतक तरूणीला दुचाकीने भद्रावती येथील एका निर्जण स्थळी नेवून चाकूने गळा कापून खून केला. विशेष म्हणजे खूनाच्या पूर्वी आरोपींनी घटनास्थळाची रेकी केली होती.मृतक मुलीची ओळख पटू नये यासाठी तिचे डोके व अंगावरील कपडे आरोपींनी घेवून गेले. सदर खून प्रकरण संदेवनशिल असल्याने पोलिस अधिक्षक अरिवंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे
आदेश दिले होते. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पोलिसांनी मृतक तरूणीची ओळख पटविल्यानंतर एका विधीसंघर्ष बालिकेला चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे.सदर बालिका गुन्ह्याची मुख्य सुत्रधार असून तिचा साथीदार प्रियकर हा फरार होता. दरम्यान पोलिसांच्या तांत्रिक पथकाने शोध घेतला असता आरोपींने बल्लारपूर रेल्वे स्थानकात दुचाकी ठेवून केरळ राज्यात फरार झाल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक केरळात जावून आरोपींला अटक केली आहे. अतिशय गुंतागुंतीच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदिप कापडे जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे यांच्या पथकाने केली आहे.

